Thursday 6 June 2019

विनाशकारी काजवा महोत्सव: किती खरा किती खोटा?

गेल्या एक-दोन आठवड्यांत काजवा महोत्सव कसा चुकीचा आहे आणि तो बंद करायला हवा हे पटवून देणारे लेख आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर विविध बातम्यांची कात्रणं, लेख, आव्हानात्मक व्हिडीओ वैगेरे फिरताना दिसत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि माझा वैयक्तिक अनुभव यामध्ये मोठी तफावत दिसते. अर्थात सह्याद्रीत भरवल्या जाणाऱ्या काजवा महोत्सवाला माझा विनाशर्त पाठिंबा आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. परंतु सर्व गोष्टी विचारात घेता, काजवे पर्यटनाचा सांगितला जाणारा परिणाम तितका आहे असं मुळीच वाटत नाही. कसं ते सविस्तर पाहू.

प्रथमतः काजवे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत हे सत्य आहे आणि ते अमान्य करण्याचं काहीच कारण नाही. आता महत्वाचा मुद्दा असा कि हे कशामुळे घडतं आहे? कुठले घटक यासाठी कारणीभूत आहेत? त्या सर्व कारणांची सूची तयार केल्यानंतर यातील प्रत्येक घटकाचा काजव्यांच्या कमी होण्यामध्ये किती वाटा आहे हे पाहावं लागेल. तोपर्यंत आपल्याला सत्य परिस्थितीचा अंदाज येणार नाही. मला सापडलेली महत्वाची कारणं त्यांच्या उतरत्या क्रमाने खाली मांडली आहेत:

१) वर्षानुवर्षे घटत चाललेला अधिवास - काजव्यांच्या अधिवासात (डोंगरउतारावर) नवी शेती तयार करणे, खाणकाम, बांधकाम, रस्तेबांधणी करणे.
२) वाढतं प्रकाशाचं प्रदूषण.
३) ग्रामीण भागात वाढता रासायनिक खते/औषधे यांचा उपयोग.
४) काजवा महोत्सव व इतर पर्यटन.

ही मांडणी या क्रमाने का ते आता पाहूया.

१) वर्षानुवर्षे घटत चाललेला अधिवास: मुळात काजव्यांचाच काय तर सर्वांचाच अधिवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे किंवा दूषित होतो आहे. त्यामध्ये पक्षी, प्राणी, फुलपाखरं, वन्यप्राणी आणि इतर सर्वच वन्यजीव आले. आता या सर्व प्रकारात काजव्यांना कुठला अधिवास लागतो ते पाहू. काजव्यांना लागते भुसभुशीत माती असलेली जमीन किंवा मुबलक पाला पाचोळा, सुस्थितीत असलेलं जंगलं आणि परिसरात पाणथळ जागा. अर्थात हे सगळं नसेल तर काजवे दिसत नाहीत असं अजिबात नाही. ते दिसतात परंतु त्यांचं प्रमाण काहीसं कमी असतं. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या आसपास असलेल्या ग्रामीण भागात देखील काही प्रमाणात काजवे दिसायचे, आजही दिसतात परंतु पूर्वीसारखं प्रमाण राहिलं नाही. त्याचं मुख्य कारण संपत चाललेला अधिवास हेच आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या गावांतील काजवे कमी का झाले असावेत ते आपण पुढे सविस्तर पाहू. तूर्तास सर्वात उत्तम अधिवास हा जंगलांचा आणि विशेषकरून भुसभुशीत माती, भरपूर पालापाचोळा आणि पाणथळ जागा असा आहे हे लक्षात घेऊ. हा अधिवास नक्की का कमी होत हे आता पाहूया.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर काजव्यांसाठी कोकण, भंडारदरा, लोणावळा, भीमाशंकर, वेल्हे ही ठिकाणं विशेष आकर्षणाची आहेत. थोडक्यात इथे गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मीसुद्धा गेली दशकभर या परिसरात फिरतो आहे. या फिरण्यातून एक गोष्ट प्रामुख्याने आढळते ती म्हणजे बेसुमार वृक्षतोड. यातील काही गावं किंबहुना बहुतांश गावं ही वनक्षेत्रात आहेत तरीही वृक्षतोड होते आहे. थोडं थोडं करून जंगल तोडलं जातं आणि डोंगरउतारावर शेती तयार केली जाते. शेतीवर जाण्यासाठी गाडीरस्ता केला जातो, वहिवाट दाखवला जातो. याला शासनदरबारी मान्यता असते किंवा नसते हे खरं तर कोडं आहे.काजव्यांना पोषक वातावरण लागतं तसं काही ठराविक वृक्षही लागतात. हे वृक्ष बहुधा डोंगर पायथ्याला जास्त प्रमाणात आढळतात. एकदा एखादा वृक्ष तोडला तर पुन्हा नवीन वृक्ष तयार होण्यास किमान दशकभरतरी वेळ लागतो. वृक्षतोडीसाठी विविधं कारणं शोधली जातात त्यामध्ये कधी मानवनिर्मित वणव्यांचा समावेश असतो, तर कधी वृक्षांच्या साली काढून ठेवल्या जातात - मग तो वृक्ष वाळल्यानंतर तोडला जातो वैगेरे. यामध्ये कधी कधी स्थानिक लोकं असतात तर कधी बाहेरील देखील असतात. वृक्षतोडीसाठी विविध बांधकामांचं एक कारण आहे. रस्ते बांधणी, घरं आणि विविध प्रकल्पांची बांधणी, हॉटेल बांधणी यासाठी जागा स्वच्छ करून बांधकामं केली जातात. यामध्ये कळत नकळत काजव्यांचा अधिवास संपवला जातो आहे.

२) वाढतं प्रकाशाचं प्रदूषण: पुण्याच्या परिसरात पूर्वी काजवे दिसायचे पण आता ते दिसत नाहीत अशी खंत जेष्ठ नागरिक व्यक्त करताना दिसतात. खरं तर तेव्हा वीज घरोघरी पोहोचली नव्हती. पुणे शहराच्या थोडं बाहेर पडलं कि आकाशातील चांदण्या स्पष्ट दिसायच्या. आज ती परिस्थिती राहिली नाही. पुण्याच्या बाहेरच काय तर पुण्यापासुन ५० किमीच्या परिसरात देखील स्पष्ट चांदण्या दिसत नाहीत. यामध्ये प्रकाशाचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण कारणीभूत आहेत. सकाळी सकाळी एखाद्या टेकडीवर जाऊन सहज पुण्यावर नजर फिरवली तर ते सहज लक्षात येईल. हीच परिस्थिती ग्रामीण भागात आहे. उदाहरण म्हणून भंडारदऱ्याजवळील रतनवाडी हे गाव घेऊ. तीन वर्षांपूर्वी मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत आम्ही काजवे पाहायला गेलो होतो. त्यादिवशी काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला होता. शांतात अनुभवायची म्हणून आम्ही गावातून मागच्या बाजूला ३०० ते ५०० मीटर आत चालून गेलो आणि अंधार होण्याची वाट पाहत एका जागी बसलो. थोड्याच वेळात भरपूर काजवे दिसू लागले. आम्ही तो अद्भुत सोहळा पाहून गावात आलो तर तिथेही तीच परिस्थिती. आजूबाजूला भरपूर काजवे दिसत होते. याउलट यावर्षी मी पुन्हा त्याच गावी गेलो. पण यावर्षी गावात लाईट असल्याने संपूर्ण गावठाण प्रकाशमान होतं. त्यापरस्थितीत आजूबाजूच्या झाडांवर एकही काजवा फिरकताना दिसत नव्हता. साहजिकच आम्ही आधीच्या जागी गेलो आणि आम्हाला भरपूर काजवे पाहायला मिळाले. हा सर्व प्रसंग मी स्थानिक काकांसोबत बोललो, चौकशी केली तर असं समजलं कि लाईट गेली तर काजवे गावातील झाडांवर पण येतात. तात्पर्य प्रकाशाच्या प्रदूषणाचा काजव्यांच्या अस्तित्वात मोठा परिणाम दिसून येतो.

३) ग्रामीण भागात वाढता रासायनिक खते/औषधे यांचा उपयोग: पश्चिम महाराष्ट्र बऱ्यापैकी सधन आहे. धरणांची संख्या, उपलब्ध पाणीसाठा यामुळे बहुतांश शेतकरी व्यावसायिक शेती करताना दिसतात. बाराही महिने पाणी उपलब्ध असल्याने वर्षभर शेतात काहींना काही पिके असतात. उत्पादनखर्च आणि विक्रीमूल्य याची सांगड बसत नसल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर सुरु केल्याचं स्पष्ट दिसतं आहे - यातून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो. यात कुणाचा दोष किती आणि  कसा तो इथला चर्चचा विषय नाही म्हणून मुद्दाम लिहीत नाही. परंतु या वाढत्या प्रमाणामुळे, जमिनीचा भुसभशीतपणा कमी झाला. बांधावरची  जुनी आंब्याची, बाभळीची व इतर झाडं तोडली गेली. त्याचा परिणाम म्हणून पाला पाचोळा कमी झाला आणि पर्यायाने काजव्यांची संख्या खूप कमी झाली. मला लहानपणचा एक किस्सा आजही स्पष्ट आठवतोय. घराजवळ एक जुनी विहीर आहे. तिथे रात्री पंपाने पाणी पडत होतं. ते पाटाने पुढे कांद्याच्या शेतात जायचं. रात्री ९-१० च्या आसपास मी सहज विहिरीवर गेलो तेव्हा हजारोंच्या संख्येने काजवे पाण्याच्या पाटावर उतरलेले पाहिले होते. यावरून ग्रामीण भागात पूर्वी परिस्थिती वेगळी होती हे स्पष्ट होतं.

४) काजवा महोत्सव व इतर पर्यटन: सह्याद्रीत गेल्या काही वर्षांत काजवे महोत्सव भरवले जात आहेत. पूर्वीही काजवे होतेच परंतु त्यातील आर्थिक गणितं कुणाच्या फारशी लक्षात आली नव्हती.काजवे पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी आयोजक मोठे ग्रुप घेऊन जाताना दिसतात. यामध्ये कधी कधी शेकड्याने लोकं असतात. यामध्ये एवढ्या लोकांना सांभाळणं आयोजकांना कठीण जातं. यातून काजव्यांनी चमकणाऱ्या झाडांवर बॅटरी लावणे, जंगलात मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, झाडांच्या जवळ जाऊन काजव्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करणे, काजव्यांचे फोटो मिळवण्यासाठी फ्लॅश वापरणे आणि चालताना पायांखाली काजवे येणे हे प्रकार प्रामुख्याने होतात. कितीही नाही म्हटलं तरी याचाही काजवे कमी होण्यात हातभार लागतोच. पण तरीही तो वरील तीन कारणांपेक्षा अत्यल्प आहे असं माझं निरीक्षण आहे. अर्थात याचंही समर्थन नाहीच!

मुळात काजवे पाहायला ज्या परिसरात लोकं जातात तो काही चौरस किमीचा परिसर असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर भीमाशंकर अभयारण्याचं घेऊयात. हे अभयारण्य १३१ चौरस किमीचं आहे. आपण असं ग्राह्य धरू कि आपण भोरगिरी परिसरात १०० लोकं काजवे पाहण्यासाठी गेलो. रात्री जंगलात काजवे पाहत फिरलो तरी एका वाटेने फार तर १० किमी चालून येऊ शकतो. माझ्या पाहण्यात तर असं आहे कि लोकं एवढं चालत नाही पण तरी तसं समजूयात. या नियमाने चौरस किमीच्या दृष्टीने विचार केल्यास फार तर १ चौरस किमी जंगल आपण फिरतो. खरं तर ते तेवढंही होत नाही. आता याचं गणित केलं तर ०.७ टक्के जंगल आपण फिरलो असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात काय तर पर्यटनामुळे ढोबळमानाने १-५% पेक्षा जास्त परिणाम होत नाही. यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते - हा काळ काजव्यांचा प्रजननकाळ असतो आणि त्यांना डिस्टर्ब करणं चुकीचं आहे. हे निश्चित खरं आहे. परंतु वर पाहिल्याप्रमाणे उरलेला ९५% पेक्षा अधिक अधिवास काजव्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे त्यांच्या प्रजननावर विशेष परिणाम होतो असं सांगणं चुकीचं आहे. त्यात काही लोकं बॅटरीच्या प्रकाश झाडांवर टाकतात हेसुद्धा सांगितलं जातं, त्याचंही समर्थन होऊ शकत नाही. पण मागे पाहिल्याप्रमाणे, गावात लाईट गेली तर काजवे पुन्हा गावातील झाडांवर पण दिसतात असं स्थानिकांचं आणि माझं स्वतःच निरीक्षण आहे. याचाच अर्थ बॅटरी बंद झाली कि पुन्हा काजवे पुन्हा तसेच चमकू लागतात. जशी पाण्यात काठी मारली तर पाणी पूर्णपणे दुभंगत नाही, ते पुन्हा एकजीव होतं तसं काजव्यांच्या बाबतीत होतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. याचा अर्थ असा नव्हे कि काजव्यांनी भरलेल्या झाडांवर बिनधास्त बॅटऱ्या माराव्यात किंवा त्यांच्या अळ्या हातावर घेऊन त्यावर टिचक्या माराव्या. या आणि अशा सर्वच अमानवी कृत्यांचा निषेधच परंतु सरसकट काजवामहोत्सव बदनाम करण्याचं जे सध्या काम सुरु आहे तेही अयोग्यच. यातून झालीच तर लोकांची दिशाभूल होऊ शकते बाकी काही नाही.

काजवे भविष्यातही दिसावेत असं आपल्या सर्वांनाच वाटत असेल तर काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे:

१) सर्वात महत्वाचं म्हणजे काजव्यांचा अधिवास वाचवायला हवा. त्यांना लागणारं पोषक वातावरण जे उपलब्ध आहे ते राखायला हवं. वाढवायला हवं. अधिवास संपला तर काजवे राहणार नाहीत? यामध्ये वनखाते मुख्य भूमिका बजावू शकते. उदा. बहुधा घाटवाटांवरून रस्ते बांधले जातात. यासाठी खूप वृक्षतोड करावी लागते. मोठं नुकसान होतं. वनखात्याने आणि जाणकारांनी पर्यायी जागा सुचवली किंवा जिथून कमी नुकसान होईल तिथून रस्ता काढला तर कमीत कमी अधिवासाला धोका पोहोचेल. जंगलात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. वनक्षेत्रात अवैध जमिनी काढल्या जात आहेत का? त्यावर निर्बंध घालता येतील का ते पाहावं. अस्तित्वात असलेले वनकायदे आमलात येतायेत कि नाही ते पाहावं लागेल. यामध्ये वनखातं महत्वाची भूमिका बजावू शकेल.
२) जाणकारांनी काजव्यांच्या अधिवासात राहण्याऱ्या नागरिकांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. काजवे का चमकतात पासून ते काय केलं नाही तर ते दूर जातील इथपर्यंत गोष्टी समजावून सांगायला हव्यात. स्थानिकांच्या सहभागाशिवाय संवर्धन कधीच होत नाही. एकदा का स्थानिकांना त्यांच्या आजूबाजूच्या ठेव्याचं महत्व पटलं कि ते स्वतः इतर गैरप्रकार रोखण्यास मदत करतील.
३) जैविक शेतीकडे वळायला हवं परंतु हा विषय वादाचा आहे आणि तो कितपत शक्य आहे हे सांगणं मोठं कठीण आहे.
४) जबाबदार पर्यटनाची गरज दिवसेंदिवस ठळक होत चालली आहे. आयोजकांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वानी जागरूक असायला हवं. तुम्ही काही रुपये भरले म्हणजे जंगलात जाऊन काहीही करण्याची पावती मिळाल्याचा गैरसमज कुणीही बाळगण्याचं कारण नाही. आयोजकांनी देखील आपण जातो त्या परिसराची संपूर्ण माहिती घ्यायला हवी. आपल्यामुळे निसर्गाला काही बाधा तर पोहोचत नाही याचा अंदाज घ्यावा. तसं असेल तर आपल्याला तो परिणाम कमी करण्यासाठी काही करता येईल का याचा विचार करावा. पर्यटकांना योग्य त्या सूचना द्याव्या. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला दोन गोष्टी ऐकवण्याची तयारी ठेवावी. थोडक्यात प्रत्येक पर्यटकाने आणि आयोजकाने संवदेनशील असणं गरजेचं आहे.

यानंतरही कुणाला असं वाटत असेल की काजवा महोत्सव विनाशकारी आहे तर ते खात्री देऊ शकतात का, की सह्याद्रीतील काजवे महोत्सव बंद झाले तर काजव्यांचा ह्रास पूर्णपणे थांबेल? मला तरी त्याचं उत्तर नाही असंच दिसतंय. कारण काजव्यांच्या कमी होण्यामध्ये पर्यटनापेक्षा खूप मोठी कारणं कारणीभूत आहेत. त्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. पर्यटनाला विनाशकारी म्हणून काही प्रमाणात का होईना लोकांची दिशाभूल (कळत नकळत) होत आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. नकळत लोक मुख्य कारणांपासून विचलित होऊन काजवा मोहोत्सवापासून दूर राहतायत.

काजवा महोत्सव हा निसर्गाचा एक अद्भुत सोहळा आहे. तो प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी अनुभवावा असाच आहे. आपल्या आजूबाजूचा निसर्ग किती सुंदर आणि सुखदायी आहे याची जाणीव तो करून देतो. भौतिक आणि कृत्रीम सुखापेक्षा कैक पटीचं सुख निसर्ग आपल्या झोळीत ओततो आहे हा विचार घेऊन माणूस जंगलातून बाहेर पडतो. किमान मलातरी काजवा महोत्सवातून हा अर्थ उमगला. इतरांचं मी काय सांगावं...

राजकुमार डोंगरे
rajkumardongare@gmail.com